भोकरदन शहरात मूलभूत सुविधांसाठी अनोखं ‘बेशरम आंदोलन’; रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात झाडं लावून वेधलं प्रशासनाचं लक्ष
By गौतम वाघ

भोकरदन शहरात मूलभूत सुविधांसाठी अनोखं ‘बेशरम आंदोलन’; रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात झाडं लावून वेधलं प्रशासनाचं लक्ष
भोकरदन : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात स्थानिक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी एक अनोखं आणि आगळंवेगळं आंदोलन सुरू केलं आहे. शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, तुंबलेलं पाणी आणि मूलभूत सुविधांच्या विस्कळीतपणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी हे ‘बेशरम आंदोलन’ छेडलं आहे. या अनोख्या आंदोलनाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमक्या मागण्या काय आहेत?
आंदोलक आणि नागरिकांनी शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खालील प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत:
- शहरातील मुख्य रस्त्यांवर व चौकात तुंबलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावणे.
- नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि नियमित नळ पाणीपुरवठा करणे.
- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांची तात्काळ सफाई करणे.
रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातच ठिय्या आंदोलन
प्रशासकीय अनास्थेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी थेट रस्त्यावर साचलेल्या दूषित पाण्यात बेशरमाची झाडं लावली. एवढेच नव्हे तर, त्याच साचलेल्या पाण्यात बसून त्यांनी प्रशासनाचा निषेध केला आणि मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेतला.
शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि सांडपाण्याच्या नियोजनाचा अभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा
या अनोख्या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकरदन शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. “शहरातील मुख्य समस्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
आता या अनोख्या आणि शांततापूर्ण मार्गाने केलेल्या आंदोलनाची स्थानिक प्रशासन कितपत दखल घेणार आणि नागरिकांना या समस्यांमधून कधी दिलासा मिळणार, याकडे संपूर्ण भोकरदन तालुक्याचे लक्ष लागले आहे.



