पारध बु. येथील शाळांसमोर गतिरोधक आणि फलकांचा अभाव; अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांतून संताप!
By तेजराव दांडगे

पारध बु. येथील शाळांसमोर गतिरोधक आणि फलकांचा अभाव; अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांतून संताप!
पारध बु. (विशेष प्रतिनिधी, तेजराव दांडगे): भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील गाव हद्दीतील नवीन रस्ता तयार होऊन अनेक महिने उलटले आहेत, तरीही या रस्त्यावर अत्यंत आवश्यक असलेले गतिरोधक (Speed Breakers) आणि ‘वाहने सावकाश चालवा’ असे माहिती फलक अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. गतिरोधकांच्या अभावामुळे गेल्या सात-आठ महिन्यांत २ ते ३ लहान-मोठे अपघात झाले असून, संबंधित विभागाच्या या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक व पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
शाळा आणि बँकांमुळे रस्त्यावर मोठी वर्दळ
ज्या परिसरात गतिरोधकांची अत्यंत गरज आहे, त्याच मार्गावर जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय आणि एक नामांकित इंग्लिश स्कूल आहे. त्यामुळे हजारो शाळकरी विद्यार्थी दररोज याच रस्त्यावरून ये-जा करतात. तसेच याच रस्त्यावर तीन महत्त्वाच्या बँका असल्याने दिवसभर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.
गतिरोधक नसल्याने या भागातून वाहने सुसाट वेगाने धावत असून, त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
फलक आणि गतिरोधक बसवणे प्राथमिक जबाबदारी
रस्ता तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ‘पुढे शाळा आहे, वाहने हळू चालवा’ असे सूचना फलक लावणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने गतिरोधक तयार करणे ही सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
अजिंठा-बुलढाणा रोडवरील वाढोणा पॅटर्नप्रमाणे गतिरोधक बसवण्याची मागणी
“अजिंठा ते बुलढाणा सिमेंट रोडवर वाढोणा येथे ज्याप्रमाणे शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत, त्याच धर्तीवर पारध बु. येथील शाळांसमोर तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत,” अशी आग्रही मागणी परिसरातील पालकांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन गतिरोधक व सूचना फलक न बसवल्यास एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


