जालना जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; स्वतंत्र ओळखपत्रे आणि आरोग्य सेवांवर भर
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; स्वतंत्र ओळखपत्रे आणि आरोग्य सेवांवर भर
जालना: ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध क्लिष्ट समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी आता अधिक समन्वयाने काम करण्याची गरज आहे. कामगारांच्या सुविधेसाठी तातडीने नवीन कार्यपद्धती (SOP) तयार करावी, तसेच ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या’ माध्यमातून कामगारांना तातडीने स्वतंत्र ओळखपत्रांचे वितरण करण्यात यावे, असे महत्त्वपूर्ण निर्देश जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल बोलत होत्या.
योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आंतरजिल्हा समन्वय
या बैठकीत ऊसतोड कामगारांचे स्थलांतर, आरोग्य, शिक्षण, पोषण, रेशन व्यवस्था (सार्वजनिक वितरण व्यवस्था) आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात कामासाठी स्थलांतरित होतात, तेथील स्थानिक प्रशासनाशी कामगारांचा डेटा (माहिती) सामायिक करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. यामुळे स्थलांतरित भागातही कामगारांना शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणे शक्य होणार आहे.
आरोग्य सेवांसाठी विशेष उपक्रम आणि ‘आरोग्य सखी’
ऊसतोड कामगारांच्या कामाच्या कठीण वेळा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिबिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार पुरवले जातील. याशिवाय, स्थलांतरित महिलांमधूनच ‘आरोग्य सखी’ची निवड केली जाईल, ज्यांना प्राथमिक उपचारांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिक्षण व बाल हक्कांवर विशेष भर
आश्रम शाळा सुरू होणार: ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण स्थलांतरामुळे खंडित होऊ नये, यासाठी मंजूर झालेल्या सर्व ‘संत भगवान बाबा बालिका आश्रम शाळा’ आगामी शैक्षणिक वर्षापासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
जन्म दाखल्यांसाठी विशेष मोहीम: ज्या बालकांकडे जन्मनोंदणी दाखले उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवून जन्मदाखले मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावागावांत पाण्याची उपलब्धता आणि जनजागृती
बैठकीत सांगण्यात आले की, ऊसतोड कामगारांचे स्थलांतर प्रामुख्याने पाण्याचा तुटवडा असल्यामुळे होते. या समस्येवर काम करून पहिल्या टप्प्यात १५ गावांमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांची गावागावांत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला देण्यात आले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस सहाय्यक समाज कल्याण सह आयुक्त स्नेहल मोदळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर. व्ही. कड, शिक्षणाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, ऊसतोड कामगार कृती समितीचे व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले आणि संपर्क अधिकारी भाऊसाहेब गुंजाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच प्रकल्प व्यवस्थापक ओंकार उगले, आश्वजित जाधव, अनुप मोरे, शिवाजी तायडे, बिस्मीला, राहुल गाढवे, एकनाथ राऊत, राजेश वाघमारे आदींनी कामगारांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या.



