“जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार कुणीही संपवू शकत नाही” – आमदार संतोष दानवे
By देवानंद बोर्डे

“जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार कुणीही संपवू शकत नाही” – आमदार संतोष दानवे
पिंपळगाव रेणुकाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात; २५ लाखांच्या सभागृहाची घोषणा
पिंपळगाव रेणुकाई (प्रतिनिधी – देवानंद बोर्डे):
“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून ते संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्थान आहेत. जोपर्यंत या जगात चंद्र, सूर्य आणि तारे आहेत, तोपर्यंत बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार कुणीही संपवू शकत नाही,” असे प्रतिपादन भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी केले.
तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हाच प्रगतीचा मंत्र
आमदार दानवे पुढे म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने शिक्षणाला आपले सर्वात मोठे शस्त्र मानले पाहिजे. बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन जगाला हेवा वाटेल असे संविधान दिले. आपण सर्वांनी जाती-पातीच्या भिंती पाडून एकजुटीने समाजाची प्रगती साधली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.
२५ लक्ष रुपयांचा निधी आणि पर्यावरण प्रेम
या कार्यक्रमात आमदार संतोष दानवे यांनी समाजासाठी २५ लक्ष रुपयांच्या भव्य सभागृहाची घोषणा केली. विशेष म्हणजे, आजचा कार्यक्रम उन्हात झाला असला तरी पुढचा कार्यक्रम सावलीत व्हावा यासाठी त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला. यावेळी त्यांनी आपल्या पर्यावरण प्रेमाची साक्ष दिली. ज्या जागेवर सभागृह बांधले जाणार आहे, तिथे काही जुनी झाडे आहेत. ती झाडे न तोडता सभागृहाचे नियोजन करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी संबंधितांना दिला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी उपसभापती सुखलाल बोडके, पोलीस पाटील गणेश निकम, पंडित नरवाडे, ताराचंद आहेर, बाबूराव बेराड, भगवान बोडके यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे यांनी केले.



