ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात पिंपळगाव रेणुकाई येथून संत जामवंत महाराज दिंडीचे आळंदी-पंढरपूरकडे प्रस्थान!
By देवानंद बोर्डे

ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात पिंपळगाव रेणुकाई येथून संत जामवंत महाराज दिंडीचे आळंदी-पंढरपूरकडे प्रस्थान!
पिंपळगाव रेणुकाई (भोकरदन): भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे वेध लागले असून, येथील प्रसिद्ध संत जामवंत महाराज दिंडी सोहळ्याचे आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीकडे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाचा गजर, विठू नामाचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
बुधवार, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी दुपारी गावातील मुख्य मंदिरामध्ये परंपरेनुसार विधीवत पूजन करून या दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
भगव्या पताका अन् पालखीने अवघे गाव झाले वारकरी!
प्रस्थान सोहळ्यादरम्यान गावातील मुख्य मंदिरापासून निघालेल्या दिंडीत वारकरी, दिंडीचे प्रमुख मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात घेतलेल्या भगव्या पताका, शिरावर घेतलेल्या तुळशीवृंदावन आणि विणेकरांच्या साथीने संपूर्ण पिंपळगाव रेणुकाई भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. महिला भाविकांनी पारंपरिक फुगड्या आणि भजने सादर करत प्रस्थान सोहळ्याची रंगत अधिक वाढवली. गावातील आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे जंगी स्वागत केले.
२५ जुलैला पायी दिंडी पोहोचणार पंढरपूरमध्ये
हा दिंडी सोहळा आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पुढे मार्गक्रमण करत पंढरपूरकडे रवाना होणार आहे. विविध गावांमधून पायी प्रवास करत ही दिंडी शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी पंढरपूर या क्षेत्री पोहोचेल. या संपूर्ण पायी प्रवासादरम्यान वारकरी भाविकांसाठी महाप्रसाद (भोजन) आणि निवासाची चोख व्यवस्था दिंडी आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. गावातील शांतता, एकता आणि समृद्ध धार्मिक परंपरा जपणारा हा सोहळा परिसरातील भाविकांसाठी नेहमीच श्रद्धेचा मोठा उत्सव मानला जातो.
मान्यवरांच्या हस्ते वाहन पूजन व उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी दिंडीसोबत जाणाऱ्या वाहनांचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले.
या पावन प्रसंगी दिंडी चालक ह.भ.प. अशोक महाराज देशमुख, मोतीराम नरवाडे, सुनील देशमुख, गणेश देशमुख, नारायण देशमुख, सुभाष मंत्री, शिवा आहेर, हरीभाऊ राऊत, विणेकरी मतकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



