पारध येथील जिल्हा परिषद शाळेत समस्यांचा विळखा; रखडलेले गट्टू काम आणि धोकादायक गेटमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला!
By तेजराव दांडगे

पारध येथील जिल्हा परिषद शाळेत समस्यांचा विळखा; रखडलेले गट्टू काम आणि धोकादायक गेटमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला!
पारध बुद्रुक (ता. भोकरदन): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केले जात असले, तरी भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मात्र विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शाळेच्या आवारात रखडलेली विकासकामे, पावसाचे साचलेले पाणी आणि मुख्य प्रवेशद्वाराची झालेली दुरवस्था यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा नाही; लघुशंकेला जाताना मुले घसरून पडण्याचे प्रकार
पावसाळा सुरू झाल्याने शाळेच्या अंतर्गत परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी (शौचालयाकडे) जाताना या साचलेल्या पाण्यातून आणि चिखलातूनच कसरत करत जावे लागत आहे. यादरम्यान चिखलावरून पाय घसरून काही लहान मुले पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे शालेय वातावरणात दुर्गंधी पसरण्याची आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
गट्टू आणून टाकले, पण काम अर्धवट; विषारी कीटकांचा धोका
शाळेच्या मैदानाचे आणि आवाराचे सुशोभीकरण करण्यासाठी पेव्हिंग ब्लॉक (गट्टू) बसवण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. यासाठी लागणारे गट्टू शाळेच्या आवारात आणून टाकण्यात आले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे. मैदानामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या या गट्टूंच्या ढिगाऱ्यामुळे विद्यार्थ्यांची खेळण्याची जागा तर कमी झाली आहेच, शिवाय या चिखलमय ढिगाऱ्यांमध्ये विषारी किडे-किटकूल असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुले खेळत असताना या कीटकांनी दंश केल्यास त्यांच्या जिवाचे काही बरे-वाईट होईल का? असा गंभीर प्रश्नचिन्ह आता स्थानिक नागरिक आणि पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
शाळेचे मुख्य गेट अत्यंत धोकादायक अवस्थेत
शाळेचे लोखंडी मुख्य गेट आणि त्याला जोडणारा सिमेंटचा खांब (पिलर) अत्यंत जीर्ण झाला आहे. खांबाचे सिमेंट निखळले असून आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत, ज्यामुळे गेटचा तोल बिघडला आहे. दररोज शेकडो लहान मुले या गेटच्या परिसरातून ये-जा करतात. हे गेट कधीही कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा
या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी बबलू तेलंग्रे, महेंद्र बेराड आणि अमोल श्रीवास्तव यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांना अधिकृत निवेदन सादर केले. “शाळेच्या आवारात साचणारे पाणी, धोकादायक गेट आणि अर्धवट राहिलेले गट्टूचे काम यांवर प्रशासनाने त्वरित बैठक घेऊन ठोस उपाययोजना करावी. अन्यथा, शिवसेना स्टाईलने परंतु पूर्णपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला शाळा प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुख्याध्यापकांनी ७ जुलै २०२६ रोजी या निवेदनाची दखल घेऊन ते स्वीकारले आहे. आता मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन या रखडलेल्या कामांची दखल कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– विशेष वृत्त, D9 News Marathi






