भोकरदन: आन्वा येथे खदानीत पोहण्याच्या कारणावरून दोन गटात राडा; दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल, ६ जण जेरबंद
By तेजराव दांडगे

भोकरदन: आन्वा येथे खदानीत पोहण्याच्या कारणावरून दोन गटात राडा; दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल, ६ जण जेरबंद
आन्वा (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे खदानीमध्ये पोहण्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही बाजूंचे एकूण ६ आरोपी अटक केले आहेत. सद्यस्थितीला गावात शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पहिली बाजू: फिर्यादी शहबाज मस्तान कुरेशी यांची तक्रार
फिर्यादी शहबाज कुरेशी (१८) यांच्या तक्रारीनुसार, ११ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते वाकडी रोडवरील खदानीमध्ये पोहत होते. यावेळी आरोपीत विष्णू सावळे आणि त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना मारहाण केली. आरोपीताने दगड फेकून मारल्याने फिर्यादीच्या पायाला जखम झाली, तसेच शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी बाजू: फिर्यादी विष्णू दशरथ सावळे यांची तक्रार
दुसरीकडे, विष्णू सावळे (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या घरी जात असताना आरोपीतांनी त्यांना वाटेत अडवले. “आमच्या मुलांना खदानीत पोहू का दिले नाही?” असे म्हणत आरोपीतांनी काठी आणि लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या तक्रारीवरून देखील भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार शहबाज कुरेशी, रफीक कुरेशी आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाची कारवाई
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संतोष डी. माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही गटांतील प्रत्येकी ३, असे एकूण ६ आरोपीतांना अटक केली आहे.
पुढील तपास सपोनि एस. डी. माने स्वतः करत असून, “गावात शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



