विशेष ग्राऊंड रिपोर्ट: पारध बुद्रुकमध्ये सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासकीय स्पष्टीकरणानंतर हालचालींना वेग!
By तेजराव दांडगे

विशेष ग्राऊंड रिपोर्ट: पारध बुद्रुकमध्ये सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासकीय स्पष्टीकरणानंतर हालचालींना वेग!
पारध बुद्रुक (प्रतिनिधी): नियोजनाअभावी सुरू असलेल्या विकासकामांचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतो, याचे विदारक चित्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे पाहायला मिळत आहे. पारध-वालसावंगी रस्त्याच्या कामामुळे गावातील सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावर आता लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.
”आमचे मुडदे पडल्यावर परवानगी देणार का?” – रवी लोखंडे यांचा रोखठोक सवाल
पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रवी लोखंडे यांनी या भीषण परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “हा परिसर प्रामुख्याने मजूर वर्गाचा आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सांडपाणी अडवण्यात आले, ज्यामुळे कंबरभर पाणी साचले होते. प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने केवळ तात्पुरता निचरा केला आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन ५ ते ६ लहान मुले सध्या तापाने फणफणत आहेत. प्रशासकीय अधिकारी इंजिनिअरच्या परवानगीचे कारण पुढे करत आहेत, मग ही परवानगी नागरिकांचा बळी गेल्यावर मिळणार का?”
अधिकारी रहिवाशांच्या आरोग्याशी खेळताहेत – प्रा. संग्राम देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस
प्रा. संग्राम देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “या दूषित पाण्यामुळे एका लहान बाळाला संसर्ग झाला आहे. रहिवाशांच्या आरोग्याशी हा क्रूर खेळ सुरू आहे. तक्रार घेऊन गेल्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची उत्तरे उर्मटपणाची असल्याची प्रतिक्रिया प्रा. संग्राम देशमुख यांनी व्यक्त केली.” अशा वृत्तीचे अधिकारी सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाहीत. यंत्रणेने तत्काळ या सांडपाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी.”
वॉर्ड क्र. ४ मधील ५ गल्ल्यांना सांडपाण्याचा वेढा – सागर देशमुख
युवा पत्रकार सागर देशमुख यांनी स्थानिक परिस्थिती मांडताना सांगितले की, “वॉर्ड क्रमांक ४ मधील ५ गल्ल्यांमधील सांडपाणी एकाच ठिकाणी जमा होत आहे. याची दुर्गंधी असह्य असून, ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून साथीचे आजार पसरणार नाहीत.”
प्रशासनाचा खुलासा: महामार्गाच्या कामामुळे अडथळा – गजानन उंबरकर (ग्रामविकास अधिकारी)
या वादावर ग्रामविकास अधिकारी गजानन उंबरकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. त्यांनी कबूल केले की, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. “आम्ही महामार्गाच्या सुपरवायझरशी संपर्क साधून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली आहे. सध्या पाणी उपसण्याचे काम पूर्ण झाले असून, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
निष्कर्ष आणि वास्तव: प्रशासनाने पाण्याचा निचरा केल्याचा दावा केला असला, तरी रहिवाशांच्या मते ही केवळ ‘तात्पुरती मलमपट्टी’ आहे. जोपर्यंत रस्त्याच्या कामात सांडपाण्यासाठी कायमस्वरूपी पाइपलाइन किंवा नाल्यांची सोय केली जात नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आता वरिष्ठ प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढते की नागरिकांना पुन्हा दुर्गंधीतच जगावे लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



