जालना: जळगाव सपकाळ येथे ७७ हेक्टर गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर
भोकरदन/ जळगाव सपकाळ (प्रतिनिधी

जालना: जळगाव सपकाळ येथे ७७ हेक्टर गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर
भोकरदन/ जळगाव सपकाळ (प्रतिनिधी): उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण हटवण्यास बुधवार, ६ मे २०२६ रोजी सुरुवात झाली. पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
जळगाव सपकाळ येथील गट क्रमांक ५५६, ५६४, ६२४ आणि ११३८ मध्ये सुमारे ७७ हेक्टर शासकीय गायरान जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून ताबा मिळवण्यात आला होता. गावातील बाबुराव रामभाऊ सपकाळ यांनी २०१७ मध्ये या अतिक्रमणाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २०१७ मध्येच हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते, मात्र प्रशासकीय पातळीवर याला विलंब झाला होता.
न्यायालयीन आदेश आणि कारवाई
उच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या अंतिम निकालानुसार, तीन महिन्यांच्या आत अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. याच आदेशाची अंमलबजावणी करत प्रशासनाने बुधवारी मोठा फौजफाटा तैनात करून कारवाईला सुरुवात केली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने कच्ची व पक्की बांधकामे जमीनदोस्त केली असून, जमिनीची हद्द कायम करून चारही बाजूंनी चारी खोदण्याचे काम सुरू केले आहे.
मोठा पोलीस फौजफाटा तैनात
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक आणि पारध पोलीस ठाण्यासह तालुक्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात होता. महसूल अधिकारी ए. एस. पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. दोड यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला.
अतिक्रमण धारकांची संख्या
प्रशासकीय नोंदीनुसार, गट क्रमांक ११३८ आणि ५५६ मध्ये मिळून एकूण २१३ पेक्षा जास्त अतिक्रमण धारक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही नवीन अतिक्रमणांचाही समावेश असल्याचे पंचनाम्यात दिसून आले.



