पाणलोटातून शाश्वत शेतीकडे: अंबड तालुक्यात ५१ हेक्टरवर २३,७९० फळझाडांची यशस्वी लागवड!
By तेजराव दांडगे

पाणलोटातून शाश्वत शेतीकडे: अंबड तालुक्यात ५१ हेक्टरवर २३,७९० फळझाडांची यशस्वी लागवड!
जालना (विशेष प्रतिनिधी): प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट विकास घटकातून (WDC-PMKSY 2.0) अंबड प्रकल्प क्रमांक १ मध्ये राबवण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. या उपक्रमातून तालुक्यातील ६५ शेतकरी कुटुंबांच्या ५१.६० हेक्टर क्षेत्रावर तब्बल २३ हजार ७९० फळझाडांची लागवड करण्यात आली असून, यामुळे पारंपरिक शेतीला शाश्वत व अधिक उत्पन्न देणाऱ्या फळबाग शेतीची जोड मिळाली आहे.
या गावांमध्ये राबवला उपक्रम
अंबड तालुक्यातील रोहिलागड, बदापूर, आवा, अंतरवाला, खेडगाव, चिकनगाव, कौचलवाडी तसेच इतर पाणलोट समिती क्षेत्रातील गावांमध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला. जलसंधारणाच्या कामांसोबतच फळबाग लागवडीची सांगड घातल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीचे संवर्धन आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला मोठा हातभार लागत आहे.
५ प्रकारच्या उच्चमूल्य फळपिकांची लागवड
या उपक्रमांतर्गत ५ प्रकारच्या विविध फळझाडांची लागवड करण्यात आली असून, त्यासाठी ४३.०६ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे:
- डाळिंब: १२,७०९ रोपे
- मोसंबी: ५,९४२ रोपे
- आंबा: ३,९२० रोपे
- सीताफळ: ७२० रोपे
- पेरू: ४९९ रोपे 🔹 एकूण लागवड: २३,७९० रोपे
रोजगारनिर्मिती आणि महिलांना हातभार
फळबागांच्या नियमित देखभालीसाठी वर्षभर छाटणी, सिंचन, तणनियंत्रण, खत व औषध व्यवस्थापन, काढणी आणि बाजारपेठ व्यवस्थापन अशा विविध टप्प्यांवर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या कामांतून रोजगार मिळाल्याने कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होत असून, रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होत आहे.
मृद संधारण आणि भूजल पुनर्भरणाला चालना
फळझाडांमुळे जमिनीवर हिरवे आच्छादन तयार होऊन मातीची धूप थांबण्यास मदत होत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रातील कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरी व बोअरवेलच्या भूजल पातळीत सुधारणा दिसून येत आहे. २३ हजारहून अधिक झाडांमुळे परिसरातील हरितक्षेत्र वाढून पर्यावरण संवर्धनालाही मोठे बळ मिळाले आहे.



