एल-निनोच्या पार्श्वभूमीवर ‘जालना जलकवच अभियान 2026’ला वेग! ‘कॅच द रेन’ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश
By तेजराव दांडगे

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर ‘जालना जलकवच अभियान 2026’ला वेग! ‘कॅच द रेन’ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश
जालना (प्रतिनिधी): संभाव्य ‘एल-निनो’ (El Niño) प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा यशस्वी सामना करण्यासाठी शासनाच्या ‘कॅच द रेन’ आणि ‘जालना जलकवच अभियान २०२६’ अंतर्गत संपूर्ण जालना जिल्ह्यात जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रविवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे (Video Conferencing) जालना महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेऊन महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
एल-निनोचे संकट आणि ७ प्रमुख कृती कार्यक्रम
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अभियानाची मुख्य उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि निश्चित कालावधीत पूर्ण करावयाच्या सात प्रमुख कृती कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. एल-निनोमुळे अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीत होणारी घट तसेच पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अभियानांतर्गत राबवले जाणारे ७ प्रमुख उपक्रम:
-
- जलपंचायत व पाणी वापर संस्था (WUA): स्थानिक पातळीवर पाणी व्यवस्थापनासाठी संस्था स्थापन करणे.
- रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग: प्रत्येक घर आणि शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी जिरवण्याची व्यवस्था उभारणे.
- जलतारा व शोषखड्डे: प्रत्येक नगरपंचायत व नगरपालिकेत किमान २००, तर महानगरपालिका क्षेत्रात किमान ५०० जलतारा व शोषखड्डे तयार करणे.
- तलाव गाळमुक्ती: लोकसहभागातून स्थानिक तलावांतील गाळ काढणे.
- बंधारे उभारणी: वनराई बंधारे आणि अनकट दगडी बंधारे उभारणे.
- भूजल पुनर्भरण: विहीर पुनर्भरण आणि भूमिगत बंधारे निर्माण करणे.
- पीक पद्धतीत बदल: पाण्याचा वापर कमी करणाऱ्या पिकांच्या पद्धतींवर भर देणे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन:
“जलसंधारणाच्या कामांमध्ये केवळ प्रशासन पुरेसे नसून लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पाणी बचत आणि भूजल पुनर्भरणासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा.”
उपमहापौरांच्या शेतातून अभियानाचा प्रत्यक्ष प्रारंभ
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला तात्काळ सुरुवात झाली आहे. जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी स्वतःच्या शेतातील नैसर्गिक उताराच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने १० बाय १० फूट आकाराचा जलसंधारण खड्डा खोदून अभियानाचा प्रत्यक्ष प्रारंभ केला.
बैठकीस लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस खालील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते:
-
- महानगरपालिका: महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, सहाय्यक आयुक्त, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी.
- प्रशासकीय अधिकारी: उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनीषा दांडगे, नगर प्रशासनाचे सहआयुक्त गवळी आणि नायब तहसीलदार डॉ. नीलम लुणावत.



