प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन; भोकरदनमध्ये गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
By तेजराव दांडगे

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन; भोकरदनमध्ये गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
जालना/भोकरदन (प्रतिनिधी): राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने १ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. भोकरदन तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला असून, आपल्या मागण्यांचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणेकर यांना सादर केले आहे.
१८ महिन्यांपासून निर्णय प्रलंबित
संघटनेचे अध्यक्ष संतोष पाखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १८ महिन्यांपासून ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारने काही मागण्यांबाबत अध्यादेश काढूनही, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संघटनेने आता प्रत्यक्ष संघर्षाची भूमिका घेतली आहे.
प्रशासनाला इशारा
भोकरदन पंचायत समितीमध्ये निवेदन सादर करताना ग्राम रोजगार सहाय्यकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनात सहभागी पदाधिकारी व सदस्य
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संतोष पाखरे, उपाध्यक्ष केशव नवल, विशाल राऊत, समाधान मिसाळ, कृष्णा, रविंद्र सावंत, वनारसे, बी.यु. भजंग, इरफान सत्तार शेख, राजेंद्र जोगदंडे, राजू सहाशे, विजय मगरे, खंडू जाधव, गजानन शेळके, चांगदेव बावस्कर, बद्री मिसाळ यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते.



