पंढरपुरात ‘मार्मिक संवाद’ तर्फे ‘आई’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन; पाच सत्रीय साहित्य संमेलनाने पंढरी दुमदुमली
(By अनिल जाधव) माय रमाईने भीमरायांची अवघी तपस्या तळहातावर धरली' – ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांचे भावोद्गार

पंढरपुरात ‘मार्मिक संवाद’ तर्फे ‘आई’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन; पाच सत्रीय साहित्य संमेलनाने पंढरी दुमदुमली
’माय रमाईने भीमरायांची अवघी तपस्या तळहातावर धरली’ – ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांचे भावोद्गार
पंढरपूर: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील ख्यातनाम प्रकाशन संस्था ‘मार्मिक संवाद’ च्या वतीने एक दिवसीय पण पाच सत्रीय भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ कवी रवी सोनार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आई’ या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रहाचे प्रकाशन १७ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ कवी व गायक कलावंत ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी सादर केलेल्या “रमाई” या भावपूर्ण कवितेच्या गायनाने संपूर्ण पंढरपूर नगरी दुमदुमून गेली. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मारुती टकले यांनी, “आईत्वाचे महात्म्य हे अवकाशापेक्षाही विशाल आहे,” असे प्रतिपादन केले.
६२ निवडक कवींच्या कवितांचा संग्रहात समावेश
या अनोख्या काव्यसंग्रहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि राज्याबाहेरून विविध क्षेत्रातील अंदाजे सव्वाशेहून अधिक कवींच्या कविता आल्या होत्या. त्यामधून अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रभावशाली अशा ६२ निवडक कवींच्या कवितांची निवड या संग्रहासाठी करण्यात आली.
या ‘आई’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रमुख अतिथी ॲड. विजयकुमार कस्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. आर. टकले, ज्येष्ठ लेखक प्रा. नागेश सिंघन, कवयित्री शोभाताई माळवे, रत्नप्रभाताई पाटील यांच्या हस्ते आणि ‘मार्मिक संवाद’ चे संपादक रवींद्र वसंत सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कथाकथन आणि काव्यमैफलीने रसिक मंत्रमुग्ध
दुसरे सत्र (कथाकथन): परकायाप्रवेशी कथाकथनासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. बबनराव महामुने यांनी मराठवाड्यातील मोगलाईच्या प्रादेशिक बोलीभाषेत उत्कृष्ट कथा सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले.
तिसरे सत्र (विशेष कवी संमेलन): या सत्रात काव्यसंग्रहातील दिग्गज कवी इंद्रजित भालेराव, लोककवी प्रशांतदादा मोरे, डॉ. च. वि. जोशी, डॉ. भारत गायकवाड, प्रा. नागेश सिंघन, प्रकाश महामुनी, शिवाजीराव बागल, शुभांगीताई दहिवाळ, आदितीताई उत्पात, छायाताई उम्ब्रजकर, डॉ. रेखाताई पौडवाल, डॉ. बबनराव महामुने, ॲड. रेखा हणमंते (सौ. रेखा कस्तुरे), ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे आणि रवींद्र वसंत सोनार यांनी आपल्या रचनांमधून आईच्या पवित्र अनुभूतीचा साक्षात्कार घडवला.
चौथे सत्र (निमंत्रित कवी संमेलन): या ऐच्छिक सत्रात शोभाताई माळवे, रत्नप्रभाताई पाटील, शुभांगीताई दहिवाळ, शैलजाताई सासवडे, सुप्रियाताई हिल्लाळ, सुरेखाताई कुलकर्णी, शिवाजीराव बागल, अंकुश पडघान, शिवाजीराव वाघमारे, दादासाहेब खरात, रावसाहेब साठे, रामलिंग हगवणे, मधुकर सुतार, संतोष रायबान, जैनुद्दीन मुलाणी, सचिन कुलकर्णी आणि आयोजक कवी रवी सोनार आदी प्रतिभासंपन्न कवींनी आपल्या हृदयस्पर्शी रचना सादर करून मैफल बहारदार बनवली.
‘आई’ काव्यसंग्रह भविष्यातील संशोधकांसाठी मैलाचा दगड
समारोपीय पाचव्या सत्रात बोलताना मुख्य वक्ते ॲड. डॉ. कस्तुरे म्हणाले की, “आई विषयावरील हा ऐतिहासिक आणि बहुधा एकमेव काव्यसंग्रह आहे. साहित्यिक विश्वातील होतकरू लेखकांसाठी तसेच ‘आई’ या संकल्पनेवर संशोधन प्रबंध (Thesis) लिहिणाऱ्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ भविष्यात अत्यंत सहाय्यभूत आणि मार्गदर्शक ठरेल.”
‘त्या तरूच्या सावलीला…’ मझल गायनाने सोहळ्याची सांगता
या अभूतपूर्व सोहळ्याची सांगता रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाखातर झालेल्या एका विशेष गायनाने झाली. आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनापर्यंत मजल मारणारे आणि चार वर्षांपूर्वी वाचनवेल साहित्य संस्थेच्या अखिल भारतीय महा काव्य करंडक स्पर्धेत १७२ कवींना मागे टाकत द्वितीय क्रमांक पटकावणारे प्रसिद्ध गीत “त्या तरूच्या सावलीला चल सखे बोलू जरा” हे ॲड. डॉ. कस्तुरे यांनी आपल्या मधाळ आवाजात सादर केले. एकाच मंचावर सलग तीन वेळा ‘वन्स मोअर’ मिळवलेल्या या मजल गायनाने पंढरपुरातील या ऐतिहासिक साहित्य सोहळ्याची अतिशय दिमाखात सांगता झाली.



