विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘स्वाधार’ योजनेतील त्रुटी सुधारण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ; अन्यथा अर्ज होणार बाद
By तेजराव दांडगे

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘स्वाधार’ योजनेतील त्रुटी सुधारण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ; अन्यथा अर्ज होणार बाद
जालना (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये काही त्रुटी (Errors) आढळल्या आहेत, त्यांना त्या सुधारण्यासाठी आता २९ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
काय आहे स्वाधार योजना?
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविली जाते. या योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतात.
त्रुटी पूर्ण करणे अनिवार्य
समाज कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे ‘त्रुटी’ (Deficiency) मध्ये आहेत. अशा विद्यार्थ्यांनी २९ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने या त्रुटींची पूर्तता करून अर्ज फेर सादर करणे आवश्यक आहे.
अंतिम चेतावणी: अर्ज होऊ शकतात अपात्र
समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, जर विहित मुदतीत विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी पूर्ण केल्या नाहीत, तर त्यांचे अर्ज अपात्र किंवा बाद ठरवले जातील. अशा विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
त्यामुळे, संबंधित विद्यार्थ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर आपले लॉगिन तपासून, जर काही त्रुटी असतील तर त्या तात्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



