बँक खाती कायमची बंद होणार; RBIच्या आदेशानंतर आता बँका करणार कडक कारवाई..
सुनिल थोरात (प्रतिनिधी)
मुंबई : जर तुमचे असे बँक खाते असेल ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही व्यवहार करत नसाल किंवा ते वापरण्यास विसरला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अती महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या बँक खात्यांमध्ये दीर्घकाळ व्यवहार होत नाहीत ती बँक खाती गोठवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास आरबीआयने बँकांना सांगितले.
निष्क्रिय बँक खाती म्हणजे काय?
निष्क्रिय बँक खाती ही अशी खाती आहेत ज्यात बँकेच्या धोरणानुसार १२-२४ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणतेही व्यवहार होत नाहीत. या कालावधीत खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास ते खाते निष्क्रिय मानले जाते.
ज्या बँक खात्यांमध्ये बराच काळ व्यवहार होत नाही अशी बँक खाती बंद करावीत असे सांगितले आहे.
आरबीआयने बँकांना आवश्यक पावले उचलून निष्क्रिय किंवा ‘गोठवलेल्या’ खात्यांची संख्या “तात्काळ” कमी करण्यास आणि त्यांच्या संख्येबद्दलची माहिती देण्यास सांगितले आहे.
अशा खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशांच्या वाढत्या रकमेबद्दल चिंता व्यक्त करताना, आरबीआयने सांगितले की त्यांच्या तपासणीमध्ये अनेक समस्या समोर आल्या आहेत. ज्यामुळे खाती निष्क्रिय किंवा ‘गोठवली’ जात आहेत.
RBI च्या पर्यवेक्षण विभागाने नुकतेच एक विश्लेषण केले ज्यामध्ये असे दिसून आले की बऱ्याच बँकांमधील निष्क्रिय खाती/ दावा न केलेल्या ठेवींची संख्या त्यांच्या एकूण ठेवींपेक्षाही जास्त आहे.
सर्व बँकांच्या प्रमुखांना जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बँकांना निष्क्रिय/ठेवी खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि अशी खाती सक्रिय करण्याची प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी त्वरित आवश्यक पावले उचलण्याची सूचना देण्यात आली आहे.