विकासाची वाट शेतापर्यंत! पारध परिसरात प्रलंबित पाणंद रस्त्यांच्या कामाला वेग; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
By तेजराव दांडगे

विकासाची वाट शेतापर्यंत! पारध परिसरात प्रलंबित पाणंद रस्त्यांच्या कामाला वेग; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
पारध (जालना): भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामाला अखेर गती आली असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या विकासकामामुळे शेतकऱ्यांचा शेतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता अधिक सुलभ होणार आहे.
वाहतुकीच्या अडचणींमधून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका
आजवर योग्य रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. पावसाळ्यात आणि पिकांच्या काढणीच्या वेळी मिरची, भाजीपाला, फळबागांसह विविध पिकांचा माल मुख्य बाजारपेठेत नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खराब रस्त्यांमुळे वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च यामध्ये मोठी वाढ होत होती. मात्र, आता सुरू झालेल्या पाणंद रस्त्यांच्या कामामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
९ किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे जाळे विकसित होणार
सध्या राजर्षी शाहू कॉलेज ते चौरेवाडी या मार्गावरील सुमारे एक किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मोहिमेत पारध परिसरात एकूण नऊ किलोमीटरहून अधिक रस्ते विकसित केले जात आहेत. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर ट्रॅक्टर, आधुनिक शेतीची अवजारे आणि मालवाहतूक करणारी वाहने थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचू शकणार आहेत, ज्यामुळे शेतीकामांना वेग येईल.
या कामाची पाहणी करताना पांदण रस्ता समिती सदस्य सुभाषभाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे, रामेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक संजय पाटील लोखंडे यांच्यासह अनेक स्थानिक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या महत्त्वपूर्ण सुविधेबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
थेट शेतापर्यंत वाहन पोहोचल्याने उत्पादनाला गती: परमेश्वर पाटील लोखंडे
या विकासकामाबाबत माहिती देताना माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे म्हणाले, “पूर्वी शेतात जाण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत असे आणि प्रामुख्याने बैलगाडीवर अवलंबून राहावे लागत होते. आता हा पाणंद रस्ता तयार झाल्याने ट्रॅक्टर व इतर मालवाहू वाहने थेट शेतापर्यंत पोहोचत आहेत. चौरेवाडी ते स्मशानभूमी हा पाणंद रस्ताही पूर्ण झाला असून, याचा शेती उत्पादनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.”
ग्रामीण विकासासाठी मूलभूत सुविधा आवश्यक: सुभाष देशमुख
भोकरदन पांदण रस्ता समितीचे सदस्य सुभाष देशमुख यांनी सांगितले की, “पारध परिसरातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा रस्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाचणार असून शेती उत्पादनाला मोठी चालना मिळेल. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा मूलभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत.”
पाणंद रस्त्यांच्या या कामामुळे पारध परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळून, भविष्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.



