जालना पोलीस दलाची मोठी कामगिरी! ११ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध; आई-वडिलांची झाली भेट
By तेजराव दांडगे

जालना पोलीस दलाची मोठी कामगिरी! ११ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध; आई-वडिलांची झाली भेट
जालना (प्रतिनिधी): नशिबाचा खेळ आणि पोलिसांची जिद्द काय असते, याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात आला आहे. तब्बल ११ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून हरवलेल्या एका मुलाचा शोध लावण्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे ११ वर्षांपासून मुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आहेत.
नेमके काय घडले होते?
पिंपळगाव कड (ता. जाफ्राबाद, जि. जालना) येथील समाधान तेजराव कड हे २०१५ मध्ये कुटुंबासह गंगापूर तालुक्यातील आशेगाव चौक येथे कामासाठी गेले होते. १० जानेवारी २०१५ रोजी त्यांचा १५ वर्षांचा मुलगा, सोमीनाथ समाधान कड, हा दौलताबाद परिसरातून हरवला. आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र अनेक वर्षे उलटूनही त्याचा पत्ता लागला नव्हता.
’आधार कार्ड’ ठरले दुवा
७ मे २०२६ रोजी समाधान कड यांच्या गावातील पत्त्यावर सोमीनाथच्या नावाचे एक ‘आधार कार्ड’ पोस्टाद्वारे प्राप्त झाले. यावरून आपला मुलगा जिवंत असून त्याने कुठे तरी आधार माहिती अपडेट केली आहे, याची खात्री पालकांना पटली. त्यांनी तातडीने जालना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची भेट घेऊन मदतीचे आवाहन केले.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस अधीक्षक श्री संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. सायबर पोलीस आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोमीनाथचा शोध घेतला असता, तो नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी येथे असल्याचे निष्पन्न झाले.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पारध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडनेर खाकुर्डी येथील एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. तिथे २६ वर्षांचा सोमीनाथ काम करताना आढळला. त्याची ओळख पटवून त्याला जालन्यात आणण्यात आले आणि ११ वर्षांनंतर त्याची आपल्या आई-वडिलांशी भेट घडवून देण्यात आली.
पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक
ही धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, जगदीश बावणे, दीपक घुगे, सागर बाविस्कर आणि सायबर पोलीस ठाण्याचे सचिन मांटे यांनी केली आहे. ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुलगा सुखरूप घरी परतल्याने कड कुटुंबाने जालना पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



