पारध येथे ‘इज्तेमा’ उत्साहात संपन्न; १० ते १२ हजार भाविकांची उपस्थिती, हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्याचे दर्शन
By तेजराव दांडगे

पारध येथे ‘इज्तेमा’ उत्साहात संपन्न; १० ते १२ हजार भाविकांची उपस्थिती, हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्याचे दर्शन
पारध/भोकरदन (प्रतिनिधी): “अल्लाहने मानवाला मौल्यवान बनवले आहे, गरज आहे ती स्वतःची किंमत ओळखून सन्मार्गावर चालण्याची. आज आपण दुनियादारीत इतके व्यस्त झालो आहोत की परलोकाचा (आखीरतचा) विचार विसरलो आहोत. मानवी चुकांतून बाहेर पडून क्षमा याचना (तौबा) करणे आणि यशस्वी जीवन जगणे हाच धर्माचा खरा संदेश आहे,” असे प्रतिपादन मौलाना हाफिज मंजूर यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील पारध येथे आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय ‘इज्तेमा’ शुक्रवारी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
१४ एकर मैदानावर भक्तीचा जनसागर
पारध-पिंपळगाव रोडवरील १४ एकर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारपासून सुरू झालेल्या या इज्तेमामध्ये भोकरदन शहरासह संपूर्ण तालुक्यातून १० ते १२ हजार भाविक सहभागी झाले होते. तब्लीगी जमात महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना हाफिज मंजूर, पुण्यातील ए. रऊफ, मुफ्ती बाबर, राज मोहम्मद, मौलाना युसूफ आणि श्री आसिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सकल मराठा समाजाकडून पाणी वाटप: सामाजिक सलोख्याचे उदाहरण
या इज्तेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन. बाहेरून येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी सकल मराठा समाज, पारध यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून पारध परिसरात जातीय सलोखा आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला असून, सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
युवकांचे योगदान आणि चोख व्यवस्थापन
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमारे एक हजार तरुणांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मंडप उभारणी, पिण्याचे पाणी, जेवण आणि स्वच्छतागृहांची उत्तम सोय करण्यात आली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि ‘खिदमत’ साथींची नियुक्ती केल्यामुळे वाहनधारकांना कोणताही त्रास झाला नाही. तसेच, खासगी डॉक्टरांच्या मदतीने मोफत आरोग्य शिबिर चालवून गरजू रुग्णांना औषधोपचार करण्यात आले.
सामूहिक प्रार्थनेने सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी मौलाना हाफिज मंजूर यांनी सामूहिक दुवा (प्रार्थना) पठण केले. यामध्ये देशात शांतता, समृद्धी आणि सामाजिक सलोखा नांदावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या इज्तेमातून आता ४ महिने आणि ४० दिवसांच्या जमाती महाराष्ट्राच्या विविध भागात प्रबोधनासाठी रवाना होणार आहेत.




