रेड्याच्या टकरीवरून वाद, जुन्या जालन्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; कदीम पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
जालना / प्रतिनिधी (तेजराव दांडगे)

रेड्याच्या टकरीवरून वाद, जुन्या जालन्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; कदीम पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
जालना, दि. २३: शहरातील गवळी मोहल्ला परिसरात रेड्याच्या टकरीवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत तीन मुख्य आरोपीतांना काजळा परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास जुन्या जालन्यातील गवळी मोहल्ला परिसरात रेड्याच्या टकरीवरून प्रेम अशोक लाड आणि आरोपी सोमनाथ लाड यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आरोपीतांनी फिर्यादी प्रेम लाड, त्यांचा भाऊ रवींद्र लाड आणि भाचा नरेश अवघड यांना मोतीबाग ईदगाह परिसरात बोलावून घेतले. मात्र, तिथे वाद मिटण्याऐवजी आरोपींनी धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या भावावर हल्ला केला.
उपचारादरम्यान मृत्यू आणि गुन्ह्यात वाढ
या हल्ल्यात रवींद्र अशोक लाड (वय २१) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जालना येथील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान आज सकाळी रवींद्रचा मृत्यू झाला. यापूर्वी कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५) नुसार गुन्हा दाखल होता, मात्र मृत्यूच्या घटनेनंतर आता यात कलम १०३(१) (खून) ची वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे तीन पथक तयार करण्यात आले होते. या पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत आरोपी १) संतोष श्रीचंद लाड, २) सुरज दादाराव लाड (दोन्ही रा. इंदिरानगर) आणि ३) सोमनाथ अशोक लाड (रा. संजयनगर) यांना काजळा गावच्या परिसरातून ताब्यात घेतले. सध्या या आरोपीतांवर अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या पथकाने केली कारवाई
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे, सपोनि आरती जाधव, पोउपनि दिनकर मोरे आणि त्यांच्या पथकातील सदा राठोड, सचिन चौधरी, अशोक खरात, बाबा गायकवाड, मतीन शेख, विलास राऊत, बलाराम जारवाल, कृष्णा चव्हाण, सदाशिव मुटकुळे व नंदू टेकाळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



