पारध परिसरात १० वी – १२ वीची परीक्षा ‘फ्री-हँड’ नाही तर ‘कॉपीमुक्त’! पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि प्रशासनाचा कडक पहारा; जाणून घ्या काय म्हणाले API माने…
By तेजराव दांडगे

पारध परिसरात १० वी – १२ वीची परीक्षा ‘फ्री-हँड’ नाही तर ‘कॉपीमुक्त’! पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि प्रशासनाचा कडक पहारा; जाणून घ्या काय म्हणाले API माने…
पारध/वालसावंगी: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या ‘कॉपीमुक्त जिल्हा’ संकल्पाची पारध पोलीस ठाणे आणि स्थानिक शिक्षण संस्थांकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. १० फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून, २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर पारध पोलिसांनी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात ‘नो एंट्री’ झोन घोषित केला असून, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
”कॉपी हा यशाचा मार्ग नाही” – API संतोष माने
पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी ‘D9 News’ शी बोलताना स्पष्ट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कुठेही कॉपीचा प्रकार घडू नये, यासाठी आम्ही प्रत्येक केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. १०० मीटरच्या आत विनाकारण फिरणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल. तसेच, परिसरातील झेरॉक्स सेंटर्सना नोटिसा बजावण्यात आल्या असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास कठोर पावले उचलली जातील. प्रत्येक सेंटरवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी या मोहिमेला सहकार्य करावे आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी.”
शिक्षण संस्थांचा शिस्तबद्ध पुढाकार:
पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव उदयसिंह लोखंडे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “कालपासून सुरू झालेल्या परीक्षा अत्यंत कडक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडत आहेत. आम्ही स्वतः जातीने लक्ष देत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले जात आहे. पोलीस प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याने परीक्षा ‘भयमुक्त’ होत आहेत.”
गुणवत्तेवर भर; वालसावंगी आणि पारधमधील शिक्षकांचे आवाहन:
पारध येथील राजर्षी शाहू कॉलेजच्या शिक्षकांनी “चांगले विद्यार्थी घडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान ही काळाची गरज आहे” असे मत व्यक्त केले. तर वालसावंगी येथील बालाजी विद्यालयाच्या शिक्षकांनी पालकांना आवाहन केले की, “पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी न करता पाल्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे. पोलीस आणि प्रशासन आपले काम चोख बजावत असून परीक्षा सुरळीत सुरू आहेत.”
साई कॅम्ब्रीज स्किल डेव्हलोपमेंट इन्स्टिट्यूट, वालसावंगी येथेही परीक्षेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण भुते यांनी माहिती देताना सांगितले की, “जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तंतोतंत पालन केले जात आहे.
D9 News विशेष:
प्रशासकीय कडकपणा आणि शिक्षण संस्थांची तत्परता यामुळे यंदा अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कॉपीमुक्त परीक्षेमुळे खऱ्या अर्थाने गुणवत्तेचा कस लागणार असून, एक सक्षम पिढी घडवण्याच्या दिशेने जालना जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे यातून दिसून येत आहे.



