जालना जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता, प्रशासनाचे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता, प्रशासनाचे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
जालना, दि. १९ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात येत्या १९ मे आणि २२ मे २०२५ रोजी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याव्यतिरिक्त, २३ मे २०२५ रोजी जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे:
• मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा जोरदार वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये.
• वीजेच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे.
• वादळी वाऱ्यादरम्यान आणि विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
• घरातील वीजपुरवठा बंद ठेवावा.
• वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. उदा. लोखंडी खांब, तारांचे कुंपण इत्यादी.
• ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल किंवा सायकल यांपासून दूर राहावे.
• मोकळी मैदाने, झाडांखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत किंवा दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिन्या अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये.
• सर्व प्रकारच्या लटकणाऱ्या किंवा तुटलेल्या तारांपासून दूर राहावे.
• वीज चमकत असताना जर आपण मोकळ्या जागेवर असाल, तर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसा आणि दोन्ही हातांनी आपले कान झाका तसेच आपले डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाका. जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवा.
• अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
• शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
• ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल, त्यांनी मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
• जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वादळी वारे आणि वीज यांपासून स्वतःचे आणि आपल्या जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (दूरध्वनी क्रमांक ०२४८२-२२३१३२) तसेच आपल्या नजीकच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.