जालना जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; दुष्काळ देखरेख समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; दुष्काळ देखरेख समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर
जालना (विशेष बातमीदार): चालू खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि पावसाच्या मोठ्या खंडामुळे जालना जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेल्या संयुक्त पीक पाहणीनंतर तयार करण्यात आलेला जिल्ह्याचा संकलित प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे.
पर्जन्यमानात मोठी घट १४ सप्टेंबर अखेर जिल्ह्यात जून महिन्यापासून झालेला पाऊस हा या कालावधीतील सरासरीच्या केवळ ८१.० टक्के झाला आहे. ऑगस्ट महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती, तर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या या मोठ्या ताणामुळे जिल्ह्यातील पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तालुकास्तरीय संयुक्त समित्यांकडून पाहणी जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संयुक्त समित्यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी केली. सर्व तालुक्यांच्या अहवालानंतर हा अंतिम संकलित अहवाल तयार करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजनाचे आवाहन शासन स्तरावर या अहवालावर आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि पिकांची अवस्था विचारात घेऊन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पुढील पीक व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.



