जळगाव सपकाळ येथे स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण; प्रशासनाकडून ७ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
By गोकुळ सपकाळ

जळगाव सपकाळ येथे स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण; प्रशासनाकडून ७ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
जळगाव सपकाळ (ता. भोकरदन): येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी व सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी दि. ९ सप्टेंबर रोजी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात पुरुषांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
अंत्यविधीच्या वेळी अडचणी अन् गैरसोय:
स्मशानभूमीकडे जाणारा पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या त्रस्ततेला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच दि. ८ सप्टेंबर रोजी एका अंत्यविधीदरम्यान नागरिकांना नदीतील पाणी आणि इतर अडथळ्यांमधून वाट काढत जावे लागले. या गंभीर घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने कायमस्वरूपी रस्ता देण्याची मागणी लावून धरली आहे.
आंदोलनात महिलांचाही सहभाग:
मंगेश प्रकाश साळवे व योगेश भगवान वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ या उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनात महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
प्रशासकीय भेट आणि ग्रामस्थांची ठाम भूमिका:
तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या रस्त्याच्या प्रश्नावर पुढील सात दिवसांत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. परंतु, केवळ आश्वासनांवर उपोषण मागे न घेता, रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
कार्यादेश व निधीची स्पष्टतेची मागणी:
सदर स्मशानभूमीचा रस्ता मंजूर आहे की नाही, याची स्पष्ट माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्ता मंजूर असल्यास त्याची प्रशासकीय मंजुरी, उपलब्ध निधी, अंदाजपत्रक (Budget) आणि कार्यादेशाची (Work Order) माहिती जाहीर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित असलेल्या या संवेदनशील विषयावर आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


