पारधच्या उपोषणाला यश, रस्ता अन् विजेचा प्रश्न मार्गी; मात्र ‘उर्दू शाळेसाठी’ उपोषणकर्ते अजूनही ठाम! माजी सभापतींची सडकून टीका
पारधच्या उपोषणाचा आज चौथा दिवस! प्रशासनाचे आश्वासन हवेतच? उर्दू शाळेच्या मागणीसाठी आंदोलक जिद्दीवर ठाम; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले!

पारधच्या उपोषणाला यश, रस्ता अन् विजेचा प्रश्न मार्गी; मात्र ‘उर्दू शाळेसाठी’ उपोषणकर्ते अजूनही ठाम! माजी सभापतींची सडकून टीका
पारधच्या उपोषणाचा आज चौथा दिवस! प्रशासनाचे आश्वासन हवेतच? उर्दू शाळेच्या मागणीसाठी आंदोलक जिद्दीवर ठाम; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले!
जालना/पारध, दि. ०७ (प्रतिनिधी- तेजराव दांडगे): जालना जिल्ह्यातील पारध बु. येथील नागरी समस्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून, आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. उपोषणाच्या रेट्यामुळे प्रशासनाने ८ कोटींच्या रस्त्याचे काम, रस्त्याची हद्द निश्चिती आणि महावितरणचे साहित्य देऊन काही प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, उर्दू शाळेच्या वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
प्रशासकीय यंत्रणा उपोषणस्थळी:
काल सायंकाळी उपोषणस्थळी पारधचे सहायक पोलीस निरीक्षक (API) संतोष माने, नायब तहसीलदार आणि PWD अधिकारी श्री. घुले यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. API संतोष माने यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिस्थितीचा आढावा घेतला, तर महसूल आणि PWD विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांबाबत तांत्रिक माहिती दिली.
रस्त्याची हद्द कायम करण्याचे तहसीलदारांचे आदेश:
या आंदोलनाचे मोठे यश म्हणजे, भोकरदनच्या तहसीलदारांनी पारध बु. ते धामणगाव या रस्ता (रा.मा. २१४) ची हद्द कायम करून मिळण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. PWD अधिकारी श्री. घुले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्त्याची हद्द निश्चित झाल्यास नाल्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.
मनीष श्रीवास्तव यांची आक्रमक भूमिका:
शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी प्रशासकीय दिरंगाईवर प्रहार केला. ते म्हणाले की, “दोन वर्षांपासून रखडलेल्या ८ कोटींच्या रस्त्याला सुरुवात होणे आणि हद्द कायम होणे हा आमच्या संघर्षाचा विजय आहे. मात्र, उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अजूनही टांगणीवर आहे. जोपर्यंत सर्व मागण्यांची लेखी पूर्तता होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.”
प्रशासकीय हालचाली आणि पेच:
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महावितरणचे उपअभियंता श्री. चेचर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पोल आणि मेंटेनन्सचे साहित्य जागेवर आणले आहे. नायब तहसीलदारांनीही स्मशानभूमीच्या जागेबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत उर्दू शाळेच्या वर्गखोल्यांबाबत शिक्षण विभागाकडून ठोस हालचाल न झाल्याने पेच वाढला असून उपोषणकर्ते शेखर श्रीवास्तव आणि बाबुराव काकफळे उपोषणावर ठाम आहेत.
माजी सभापतींचा ‘निवडणूक स्टंट’ असल्याचा आरोप:
दरम्यान, या उपोषणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते तथा माजी सभापती परमेश्वर लोखंडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत या आंदोलनावर बोचरी टीका केली आहे. “दहा वर्षात जे जमलं नाही, त्याची आता निवडणूक जवळ आल्यावर नौटंकी केली जात आहे. हे उपोषण म्हणजे केवळ ‘लबाड लांडग्याचं ढोंग’ आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. रस्ते कामाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमदार संतोष पाटील दानवे यांनी हा रस्ता आधीच मंजूर केला होता, मात्र याच मंडळींनी तो अडवला होता आणि आता त्याचे श्रेय लाटण्यासाठी उपोषणाचे नाटक केले जात आहे.
सद्यस्थिती आणि चिंता:
प्रमुख मागणी: उर्दू शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने मंजूर व्हावे.
आरोग्य: उपोषणाचा चौथा दिवस असल्याने आंदोलकांच्या आरोग्याची काळजी वाढली आहे.
प्रशासन: काही मागण्यांवर अंमलबजावणी सुरू झाली असली तरी मुख्य मागणी अद्याप प्रलंबित आहे.




