जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
येत्या काही दिवसांत जालना जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
येत्या काही दिवसांत जालना जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
जालना, दि. २२ मे, २०२५ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यासाठी आज, २२ मे, २०२५ रोजी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ४०-५० कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील तीन दिवसांचे हवामान अंदाज:
• २३ मे, २०२५: ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता.
• २४ व २५ मे, २०२५: विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनातर्फे जालना जिल्ह्यातील नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे:
काय काळजी घ्याल?
• सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या: मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नका. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं टाळा.
• विद्युत उपकरणांचा वापर टाळा: गडगडाटीच्या वादळादरम्यान आणि विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळा.
• मोकळ्या जागा आणि उंच ठिकाणांपासून दूर राहा: ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर राहा. मोकळं मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातूचं कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नका. सर्व प्रकारच्या लटकणाऱ्या किंवा लोंबणाऱ्या तारांपासून दूर राहा.
• मैदानात अडकल्यास: विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास, सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाका आणि आपलं डोकं दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाका. जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवा.
• शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी वेळीच नियोजन करा. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसं नियोजन केलं असेल, तर मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
• जनावरांची काळजी घ्या: जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा.
सर्व नागरिकांनी वादळी वारे आणि विजांपासून स्वतःचं आणि जनावरांचं संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.
आपत्कालीन परिस्थितीत: जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (दूरध्वनी क्रमांक: ०२४८२-२२३१३२) वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधा.