मराठी उद्योजकांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही — डॉ. श्रीपाल सबनीस
गौतम कोतवाल लिखित ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन; ३२ उद्योजकांच्या संघर्ष आणि यशोगाथांचा वेध

मराठी उद्योजकांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही — डॉ. श्रीपाल सबनीस
गौतम कोतवाल लिखित ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन; ३२ उद्योजकांच्या संघर्ष आणि यशोगाथांचा वेध
पुणे: “महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला आणि त्यामध्ये मराठी उद्योजकांचा इतिहास नसेल, तर तो इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्र आज देशाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्व करत असून, राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये उद्योजकांचा मोलाचा वाटा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
लेखक गौतम कोतवाल लिखित ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. गौतम कोतवाल यांचे हे ५५ वे पुस्तक असून, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या ३२ उद्योजकांच्या यशामागील विचार, संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवासाच्या कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन वर्ल्ड यांच्या वतीने करण्यात आले होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, “कथा, कविता आणि अन्य साहित्यप्रकारांबरोबरच कष्टकरी वर्गाला रोजगाराच्या संधी निर्माण करून देणाऱ्या उद्योजकांचाही इतिहास लिहिला गेला पाहिजे. गौतम कोतवाल यांनी अनेक उद्योजकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यशोगाथा लेखनातून समाजापुढे मांडल्या आहेत. महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा इतिहास लिहिताना भविष्यात त्यांच्या साहित्याचा संदर्भ घ्यावा लागेल.”
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी म्हणाले, “उद्योजकांच्या यशोगाथांवरील लेखनातून भावी पिढीला उद्योजकतेचा दृष्टिकोन मिळेल. त्यामुळे अशा प्रकारचे साहित्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे.”
लेखक गौतम कोतवाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या पुस्तकात यशस्वी उद्योजकांचा केवळ गौरव करण्यात आलेला नाही, तर त्यांनी केलेला संघर्ष आणि संकटांवर मात करत मिळवलेल्या यशाचा परामर्श घेण्यात आला आहे. युवकांनी ‘नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे’ हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
या सोहळ्यात ‘Iconic Leader of Maharashtra’ पुरस्काराने हितेश ज्ञानदेव उपाध्ये (संचालक, MSSG Solution Private Limited) आणि नितीन चव्हाण (संचालक, Waves Telephone Company) यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच पुस्तकातील यशोगाथांचा भाग असलेल्या अनिल राज पिसे, राजेंद्र शिंदे, प्रा. डॉ. गजानन एकबोटे, विक्रम गायकवाड, संजय वायाळ, डॉ. रमेश भोईटे, रामदास मारणे, डॉ. संतोष घोणे, दत्तात्रय यादव, केवळ देवरे, जयवंत शिंदे, रवींद्र मेटकर, बाबारावजी जळमकर, डॉ. वारिद अल्ताफ, संदीप भडांगे, ऍड. जितेंद्र सावंत, यशवंत मानखेडकर आणि संजय साबळे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



