जालना येथे 19 मे 2025 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
By तेजराव दांडगे

जालना येथे 19 मे 2025 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
जालना, दि. 16 : महिला व बाल विकास विभागातर्फे जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.
तालुका स्तरावर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसील कार्यालयात, तर जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्यानुसार, दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महिला लोकशाही दिनात आपली तक्रार दाखल करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्यांच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये तयार करून महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज स्वीकृतीसाठी खालील निकष लागू असतील:
• तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.
• तक्रार निवेदन दोन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
• संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट नसावे.
• अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
• सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.
निवडणूक आचारसंहिता लागू असताना आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, त्या त्या स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
इच्छुक महिलांनी प्रथम त्यांच्या संबंधित तहसीलदारांकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतींमध्ये तक्रार दाखल करावी. तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिनात जर एका महिन्याच्या आत कार्यवाही झाली नाही, तर संबंधित महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करू शकतील. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर, जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत देण्याची जबाबदारी संबंधित अध्यक्ष (तहसीलदार) आणि सदस्य सचिव (बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांची राहील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुका स्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.