सौर कृषी पंप बसविण्यास ‘सूर्या इंटरनॅशनल’चा विलंब; पिंपळगाव रेणुकाईच्या शेतकऱ्यांचा संताप
By गौतम वाघ

सौर कृषी पंप बसविण्यास ‘सूर्या इंटरनॅशनल’चा विलंब; पिंपळगाव रेणुकाईच्या शेतकऱ्यांचा संताप
भोकरदन (प्रतिनिधी – गौतम वाघ): महाराष्ट्र शासनाच्या “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामात खासगी कंपनीकडून होत असलेल्या अक्षम्य विलंबामुळे भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
वर्क ऑर्डर मिळूनही काम ठप्प
पिंपळगाव रेणुकाई येथील अनेक शेतकऱ्यांना ३ ते ५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप मंजूर झाले आहेत. या पंपांच्या बसविण्याचे काम ‘सूर्या इंटरनॅशनल एंटरप्राइज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. महावितरणकडून वर्क ऑर्डर प्राप्त होऊनही नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांकडे दाद मागितली आहे.
महत्त्वाच्या नेत्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार
या संदर्भात उपविभागीय अधिकारी बी. सन्नन आणि तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना ५ एप्रिल २०२६ रोजी सविस्तर निवेदन पाठवण्यात आले आहे.
अतिरिक्त पैशांच्या मागणीचा गंभीर आरोप
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, वारंवार पाठपुरावा करूनही कंपनी साहित्य पुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी काम करण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचेही धक्कादायक आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.
माजी सरपंच शिवनारायण आहेर
“कंपनीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असूनही टंचाई भासत आहे. मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून प्रशासनाने या कंपनीला काळ्या यादीत टाकावे.”
गजु आप्पा देशमुख (सामाजिक कार्यकर्ते)
“शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात खासगी कंपन्या अडथळा ठरत आहेत. शेतकऱ्यांना तातडीने न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल.”
तक्रारदार शेतकरी
निवेदन देतेवेळी सागर देशमुख, शालीकराम आहेर, गणेश सास्ते, राहुल जाधव यांच्यासह साहेबराव गाडेकर, हरिदास गावंडे, संतोष देशमुख, मंगला आहेर, गणेश बेराड, भास्कर नरवाडे, वंदना बोडखे, उमाशंकर गुप्ता, भागवत पालकर, पुष्पाबाई देशमुख यांसारख्या अनेक बाधित शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने सौर पंप कार्यान्वित करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.



