जालन्यात ‘कॉपी’ प्रकरणाची गंभीर दखल; ६ शिक्षकांचे निलंबन, तर केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा दादा भुसे यांचा इशारा!
By तेजराव दांडगे

जालन्यात ‘कॉपी’ प्रकरणाची गंभीर दखल; ६ शिक्षकांचे निलंबन, तर केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा दादा भुसे यांचा इशारा!
जालना/अंबड/बदनापूर: जालना जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या ६ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. भरारी पथकाच्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या केंद्रांवर झाली कारवाई:
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील शहागड, गोंदी, रोहिलागड आणि बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी काही परीक्षार्थींकडे कॉप्या आढळून आल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर प्रशासनाने तत्परतेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
केंद्रांची मान्यता धोक्यात; दादा भुसे यांचा कडक इशारा:
या प्रकरणावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी कठोर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “ज्या केंद्रांवर अशा प्रकारचे गैरप्रकार समोर आले आहेत, त्या केंद्रांची मान्यता रद्द केली जाईल. तसेच यासाठी जबाबदार असलेले अधिकारी, केंद्रप्रमुख आणि वेळप्रसंगी पालकांवरही कारवाई करण्यात येईल.” आगामी दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई एक मोठा इशारा मानली जात आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष देण्याचे आवाहन:
शासनाच्या ‘कॉपीमुक्त’ अभियानाला विद्यार्थ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. “विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वर्षभर मेहनत घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जावे,” असेही भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
D9 News विशेष विश्लेषण:
जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर ‘कॉपीमुक्त’ अभियान राबवले जात असताना, दुसरीकडे पारध आणि वालसावंगी परिसरात पोलीस आणि प्रशासन अत्यंत सतर्क आहे. API संतोष माने आणि स्थानिक संस्था चालक जसे की उदयसिंह लोखंडे हे प्रशासनाला सहकार्य करत असताना, जिल्ह्यात इतरत्र झालेली ही कारवाई इतर केंद्रांसाठीही धोक्याची घंटा ठरली आहे.
अचूक आणि निर्भीड बातमीसाठी न्यूज वेबसाईट ला भेट द्या…



