जालना जिल्ह्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी ‘कलम १६३’ लागू! कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी ‘कलम १६३’ लागू! कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
जालना, दि. ०६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा यंदा ‘हायटेक’ देखरेखीखाली पार पडणार आहेत. “शिक्षण ही राष्ट्रनिर्मितीची पायाभूत शक्ती असून, परीक्षा प्रक्रियेतील प्रामाणिकपणा हा त्याचा आत्मा आहे,” असे सांगत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.
परीक्षा केंद्रावर जमावबंदी आणि सीसीटीव्हीची नजर:
जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परीक्षांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या काळात परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले असून, जमावबंदी आणि अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक परीक्षा केंद्रातील हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, परिसरावर ड्रोनद्वारे टेहळणी केली जाणार आहे.
गैरप्रकार केल्यास थेट जेलची हवा:
जर एखादा परीक्षार्थी, पालक किंवा केंद्राशी संबंधित कर्मचारी कॉपी, मोबाईलचा वापर किंवा प्रश्नपत्रिका फोडण्यासारख्या गैरप्रकारात सहभागी आढळला, तर त्याच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा अधिनियम १९८२ अन्वये थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील परीक्षेचे नियोजन:
१० वीची परीक्षा: १०२ परीक्षा उपकेंद्रांवर पार पडणार.
१२ वीची परीक्षा: ७९ परीक्षा उपकेंद्रांवर पार पडणार.
सुरक्षा यंत्रणा: बैठे पथक, भरारी पथक आणि पोलीस यंत्रणा चोवीस तास सतर्क राहणार आहेत.
अफवांना बळी पडू नका:
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवा किंवा आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी आणि पालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.



