एकाच ठिकाणी वाचा: जालना जिल्ह्याच्या घडामोडी; मंत्र्यांचा दौरा, महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासकीय आवाहन
By तेजराव दांडगे

एकाच ठिकाणी वाचा: जालना जिल्ह्याच्या घडामोडी; मंत्र्यांचा दौरा, महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासकीय आवाहन
जालना, दि. २५: जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, नायब तहसीलदार तुषार निकम यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दोन कॅबिनेट मंत्र्यांचा २६ सप्टेंबर रोजी जालना दौरा, शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी जालना जिल्हा दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे गजबजणार आहे.
१. मंत्री मंगलप्रभात लोढा (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)
दुपारी १.५५ वाजता: हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आगमन.
दुपारी २.०० वाजता: इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन (मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती).
दुपारी ३.०० वाजता: शासकीय आयटीआय येथील जागेवरील अतिक्रमण विषयावर बैठक.
दुपारी ३.३० वाजता: शॉर्ट टर्म कोर्सबाबत जि.व्य.शि.प्र. विभागाची बैठक.
सायंकाळी ४.३० वाजता: बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट.
सायंकाळी ५.०० वाजता: छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
२. मंत्री उदय सामंत (उद्योग व मराठी भाषा विभाग)
सकाळी ११.०० वाजता: जालना शहर व ग्रामीण भागातील अतिवृष्टीमुळे बाधित भाग आणि औद्योगिक क्षेत्राची पाहणी करतील.
दुपारी ४.०० वाजता: जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आवाहन, गुंठेवारी नियमावलीला मुदतवाढ
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम, २०२१ (नियमाधीन करणे) अंतर्गत ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे अनधिकृत भूखंड आणि बांधकामे नियमाधीन करण्यासाठी शासनाने आता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जालना जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील नागरिकांनी परवानाधारक आर्किटेक्ट/इंजिनियर यांच्यामार्फत विहित कागदपत्रांसह आपले प्रस्ताव गुंठेवारी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावेत. मुदतीत प्रस्ताव न दिल्यास अनधिकृत बांधकामे पाडण्याची कार्यवाही केली जाईल, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) यांनी केले आहे.
थकीत कर्जदारांना ‘ओटीएस’ सवलत
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम एकरकमी भरणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देणारी एकरक्कमी परतावा (OTS) योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (०२४८२-२२३४२०) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
जादूटोणा विरोधी कायद्यासाठी ‘जिल्हा समन्वयक’ नेमणार
समाजात रुजलेल्या अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा समन्वयक (विना मोबदला) नेमण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवक (महिला/पुरुष) यांनी आपली कागदपत्रे आणि पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र सह आपले प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे.
ग्रामीण डाक जीवन विमा एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर डाक विभागांतर्गत ५० ग्रामीण डाक जीवन विमा एजंटची (तात्पुरत्या आणि कमिशन तत्वावर) नेमणूक करायची आहे. यामध्ये अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी आणि जाफ्राबाद या जालना जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे.
पात्रता: १८ ते ६० वर्षे वयोगट. (५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावासाठी १०वी पास, तर ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी १२वी पास)
इच्छुक उमेदवारांनी आपली कागदपत्रे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवर अधीक्षक, डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या कार्यालयात जमा करावीत.
लोकशाही दिनाचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
१) अर्जदारांनी अर्ज विहित नमुन्यात आणि दोन प्रतीमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
२) अर्जदाराने यापूर्वी तालुकास्तरीय लोकशाही दिनात (तिसऱ्या सोमवारी) अर्ज दिलेला असावा आणि त्यावर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसेल तरच जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज स्वीकारला जाईल.
३) न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवाविषयक बाबी आणि अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांनी http:jalna.mic.in या संकेतस्थळावरून विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.