पारधकरांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी ४ फेब्रुवारीपासून उपोषण; गावठाणातील विजेचा प्रश्न आणि रस्त्यांची दुरावस्था ऐरणीवर
By तेजराव दांडगे
पारधकरांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी ४ फेब्रुवारीपासून उपोषण; गावठाणातील विजेचा प्रश्न आणि रस्त्यांची दुरावस्था ऐरणीवर
प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन
पारध (D9 News प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील मूलभूत सोयीसुविधांकडे होणाऱ्या प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. विजेच्या समस्या, रस्त्यांची कामे आणि शाळा खोल्यांची मंजुरी यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ पासून ग्रामपंचायत पदाधिकारी, उर्दू शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ बांधव बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
काय आहेत मुख्य मागण्या?
१. महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध: गावातील विजेची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. मोडकळीस आलेले २५ पोल तात्काळ बदलणे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे (पराशर नगर येथे १०० केव्ही आणि चौरीवाडी येथे १०० केव्ही), ३३ केव्ही सबस्टेशनची क्रॉसिंग काढणे आणि मेंटेनन्सची कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२. रस्ते आणि नाली कामांचा प्रलंबित प्रश्न:
पारध बु. ते पारध खुर्द आणि पारध बु. ते धामणगाव रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करणे.
रस्त्यांच्या दुतर्फा नालीचे काम करून सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीची हद्द निश्चित करणे.
रायघोळ नदी ते मर्दडीदेवी मंदिर आणि वालसावंगी फाटा ते महेश देशमुख यांच्या शेतापर्यंत दुभाजक (Divider) बसवणे.
ग्रामीण रस्ते विकास योजनेतून नवीन रस्त्यांची कामे मंजूर करणे.
३. शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांचे प्रश्न:
पारध उर्दू प्राथमिक शाळेसाठी ५ नवीन खोल्या तात्काळ मंजूर करणे.
हिंदू सार्वजनिक स्मशानभूमीची (गट नं. ३८९) ७/१२ वर वहिवाटीप्रमाणे अधिकृत नोंद घेणे.
प्रशासनाला इशारा:
या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी जालना आणि संबंधित विभागांना लेखी निवेदने देण्यात आली आहेत. “वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने आम्हाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पारध येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन छेडले जाणार असून, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
D9 News विशेष मत:
एका बाजूला डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला पारध सारख्या मोठ्या गावाला साध्या वीज खांबांसाठी आणि रस्ते कामांसाठी उपोषणाला बसावे लागणे, हे प्रशासनाचे अपयश आहे का? हे आंदोलन प्रशासन कशा प्रकारे हाताळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बातमी संकलन: तेजराव दांडगे, डी नाईन न्यूज, पारध.



