तरवडी नगरीत रंगले ‘साहित्यिक संमेलन’; ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने!
By अनिल जाधव
तरवडी नगरीत रंगले ‘साहित्यिक संमेलन’; ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने!
तरवडी (नेवासा) / प्रतिनिधी:
सत्यशोधक चळवळीचे केंद्र आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तरवडी नगरीत ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सुसंकल्प साहित्यिक व सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ज्येष्ठ कवी ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे आणि डॉ. बबनराव महामुने यांच्या कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख करत संमेलनाची उंची वाढवली.
काव्यप्रतिभेची आंतरराष्ट्रीय ऊर्जा तरवडीत!
या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ साहित्यिक ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे. त्यांच्या जगप्रसिद्ध ‘त्या तरूच्या सावलीला…’ आणि ‘एका कवितेमुळे…’ या कवितांनी उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. मैत्र आणि नात्यांमधील ओलावा जपणा-या त्यांच्या काव्यशैलीने साहित्यिक वातावरणात जणू एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. विशेषतः आपल्या अर्धांगिनीवरील प्रेमाचा आदर व्यक्त करणाऱ्या त्यांच्या शब्दांनी अनेक कवी-कवयित्रींच्या डोळ्यात भावुक अश्रू तरळले.
सामाजिक विषमतेवर आसूड
साहित्यिक कथाकार डॉ. बबनराव महामुने यांनी ‘ही समानता कोणती?’ ही कविता सादर करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही दिसणाऱ्या सामाजिक विषमतेवर थेट भाष्य केले. त्यांच्या या मर्मभेदी कवितेने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले.
सायमन बारस्कर यांचा आदर्श हट्ट!
संमेलनाचे आयोजक आणि ज्येष्ठ कवी सायमन बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यात आला होता. मात्र, “पत्नीच्या उपस्थितीशिवाय केक कापणार नाही,” हा त्यांचा प्रेमळ हट्ट पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. एका साहित्यिकाने कौटुंबिक मूल्यांना दिलेले हे महत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.
मान्यवरांची मांदियाळी
मा. बाबासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. देसाई आबा देशमुख यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष मा. राजेंद्र फंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मा. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि धर्मगुरू उपस्थित होते. संमेलनात विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला.
शिस्तबद्ध नियोजन आणि ऐतिहासिक परंपरा
मुकुंदराव पाटील यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा जपणाऱ्या तरवडीकरांनी पाहुण्यांच्या पाहुणचारात कोणतीही कसर सोडली नाही. विशेष म्हणजे, सकाळपासून सायंकाळपर्यंत चाललेल्या या दोन सत्रांच्या संमेलनात एकही रसिक आपली जागा सोडून हलला नाही, हे या संमेलनाच्या यशाचे गमक ठरले. सायमन बारस्कर यांच्या अचूक नियोजनामुळे या संमेलनाने तरवडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.



