खाकी वर्दीतील माणुसकी! जालना पोलिसांनी जिंकली उमेदवारांची मने
जालना पोलीस प्रशासनाचा माणुसकीचा चेहरा! भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी केली राहण्याची आणि जेवणाची शाही सोय

जालना पोलीस प्रशासनाचा माणुसकीचा चेहरा! भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी केली राहण्याची आणि जेवणाची सोय
जालना: महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी जालना जिल्ह्यात दाखल होत आहेत. मैदानी चाचणीसाठी आलेल्या या उमेदवारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जालना पोलीस प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि माणुसकी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जालना पोलिसांचे ‘माहेरपण’
जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी निवासाची आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र हॉल, पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या भावना: ‘आईची माया लाभली’
बुलढाणा जिल्ह्यातील शेलू येथून आलेली आरती मारुती वाघ म्हणाली, “आम्ही पोलीस भरतीसाठी येथे आलो आहोत. येथे आल्यावर सरांनी आमच्यासाठी एवढी छान व्यवस्था केली आहे. स्वच्छ हॉल, मार्गदर्शन आणि अगदी डॉक्टरांची टीम सुद्धा उपलब्ध आहे. ही व्यवस्था पाहून खूप धीर मिळाला.”
जिंतूरहून आलेल्या प्रियंका मुंडे आणि देळगावमही येथील वैष्णवी चेके यांनी देखील प्रशासनाचे आभार मानले. वैष्णवीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सुरुवातीला भीती वाटत होती की येथे कोणी ओळखत नाही, मग कसं होईल? पण येथे आल्यावर एखाद्या पोरक्या मुलाला जशी मायेची उब मिळते, तशीच वागणूक आम्हाला जालना पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.”
डॉक्टरांचे पथक आणि मार्गदर्शक मार्गदर्शन
केवळ निवास आणि भोजनच नाही, तर उमेदवारांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचे पथक २४ तास तैनात आहे. आहार कसा असावा आणि मैदानी चाचणीच्या वेळी स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दलही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. सोबत आलेल्या पालकांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
जालना पोलिसांच्या या उपक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. “खाकी वर्दीतील माणुसकी” असे म्हणत नेटकरी पोलिसांचे आभार मानत आहेत. पोलीस भरतीच्या निमित्ताने प्रशासनाने राबवलेला हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी देखील आदर्श ठरत आहे.



