जालना जिल्ह्यात ‘कॉपीबहाद्दरांची’ खैर नाही! १० फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा; संवेदनशील केंद्रांवर ‘ड्रोन’ची करडी नजर!
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात ‘कॉपीबहाद्दरांची’ खैर नाही! १० फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा; संवेदनशील केंद्रांवर ‘ड्रोन’ची करडी नजर!
जालना, दि. ०५: जालना जिल्ह्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. “जालना जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवावा,” असे कडक निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
ड्रोन कॅमेऱ्यांचे ‘धाडसत्र’:
जिल्ह्यात बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. यावर्षी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हायटेक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या १२ परीक्षा केंद्रांवर (बारावीची ८ आणि दहावीची ४ केंद्रे) ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असतील.
पोलिसांची भूमिका महत्त्वाची:
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, परीक्षा केंद्राच्या परिसरात होणारे बाह्य हस्तक्षेप आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अतिशय दक्षता बाळगावी. परीक्षा काळात अनुचित प्रकार घडल्यास संबंधित यंत्रणेवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील परीक्षेचे स्वरूप:
इयत्ता १२ वी: ३७,३३८ विद्यार्थी, ७९ परीक्षा केंद्रे.
इयत्ता १० वी: ३२,४३३ विद्यार्थी, १०२ परीक्षा केंद्रे.
बालमजुरीविरोधातही धाडसत्र राबवण्याचे आदेश:
याच बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या वतीने २६ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान राबवल्या जाणाऱ्या मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यातील हॉटस्पॉट्सवर धाडसत्र राबवून बालमजुरांची सुटका करण्याचे आदेश त्यांनी दिले. उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांना ‘बालस्नेही पोलीस पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येईल, असेही मित्तल यांनी जाहीर केले.



