पारध परिसरात दिवसाढवळ्या जिवंत झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमींमधून संताप
By तेजराव दांडगे

पारध परिसरात दिवसाढवळ्या जिवंत झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमींमधून संताप
पारध, दि.18: भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात वनविभाग व महसूल विभाग नेहमीप्रमाणेच गायब झाल्याने रानकसायांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बेसुमार डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे. याकडे मात्र वनविभाग अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे कानाडोळा करीत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींमधून केला जात आहे.
यापूर्वी देखील पर्यावरण प्रेमींनी वनविभागाकडे तक्रारी केल्यानंतर वनविभागाने केवळ त्यांची मनधरणी करण्याकरिता शेतशिवारात जात पाहणी केली असता आपल्या हाती काहीच गवसले नसल्याचे कारण पुढे करीत हात वर केल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. विशेष म्हणजे शिवारात तसेच रस्त्यावर जागोजागी तोडलेल्या वृक्षांचे ढिग पडलेले असताना देखील दुर्लक्ष केले जात असल्याने वनपाल साहेब ‘हात ओले’ तर करीत नाही ना? अशी चर्चा पर्यावरण प्रेमींमधून रंगत आहे.
तालुक्यातील पारध परिसर हा वीस ते पंचवीस गावांचा मिळून विस्तारलेला आहे. एकेकाळी या परिसराची ओळख तालुक्यात वनसंपदेची पंढरी म्हणून होती. या भागात निसर्गाने भरभरून वनसंपदा दिली आहे. त्यामुळे या परिसरावर निसर्ग देखील नेहमी मेहरबान असायचा; परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांपासून परिसरातील पारधसह पिंपळगाव रेणुकाई, वरुड, रेलगाव, कोसगाव, अवघडराव सांवगी, मोहळाई, लेहा, शेलुद, जळगाव सपकाळ, कोठा कोळी, करजगाव, कल्याणी, आडगाव दहिगाव, आन्वा, आदी भागांसह इतर भागांतील देखील मोठमोठ्या लिंब, बाभूळ, वड, पिंपळ, चंदन, साग, निलगिरी, आंबा, काटशेवरी, वड आदी हिरव्यागार झाडांची कत्तल भरदिवसा अमानुषपणे अत्याधुनिक औजारांच्या साहाय्याने केली जात आहे. त्यामुळे घनदाट जंगले ओसाड झाली आहेत. मागील काही दिवसांपासून परिसरात अवैध वृक्षतोडीने डोके वर काढले आहे.
दिवसेंदिवस पडत असलेला दुष्काळ व निसर्गाचा समतोल बिघडत असताना वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र, या परिसरात निसर्गाविरोधी कृत्य करणारे व काही दलाल मिळून शेतकऱ्यांना मोठ्या पैशाचे आमिष दाखवून वनसंपदेला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भविष्यकाळातील धोका माहीत असून देखील वृक्षतोडीचा सपाटा सुरू आहे. या परिसरात गेल्या तीस वर्षांपूर्वी घनदाट वृक्ष होते. मात्र, परिसरात सद्यस्थितीत रानकसायांनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांनी झाडे विकण्यास विरोध केला तर हे रानकसाई रात्रीची पाळत ठेवत त्या शेतकऱ्याचे झाड देखील रातोरात परस्पर लांबवत असल्याचे प्रकार या भागात घडत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात एक दहशत निर्माण झाली आहे.
या भागातून रोज भरदिवसा ट्रॅक्टर तसेच ट्रकद्वारे रोज लाकडे शहरी भागाकडे वाहून नेली जात आहेत. बेसुमार होत असलेल्या वृक्षतोडीला संबंधित विभागच जबाबदार असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून सांगितले जात आहे. वनविभाग व महसूल विभागाचे वृक्षतोड करणाऱ्यांसोबत अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
एकीकडे शासन दरवर्षी झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया घालताना दिसत आहे, तर दुसरीकडे काही बेजबाबदार व पैशाच्या मोहात असलेल्या संबंधित विभागामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची योजना पाण्यात जात असल्याचे चित्र सध्या या भागात पाहावयास मिळत आहे. संबंधित प्रकार परिसरातील पर्यावरण प्रेमींनी वनविभागाला कळविला असता तरी वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे होत आहेत. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
दुष्काळात वाढला तस्करांचा सुळसुळाट
भोकरदन तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून दलालांच्या मार्फत हे लाकूड तस्कर शेतकऱ्यांची मनधरणी करून झाडे तोडू लागले आहेत. सध्या परिसरातील सर्वच भागात भरदिवसा वारेमाप वृक्षतोड केली जात आहे. विशेष म्हणजे हे लाकूड तस्कर भोकरदन तालुक्यातील तसेच परिसरातील असल्याने त्यांना या भागातील सर्वच माहिती ज्ञात असल्याने वृक्षतोडीचा धंदा त्यांचा सध्या जोरात सुरू आहे.
“शासन उद्देशाला तिलांजली – शासन एकीकडे दुष्काळाला लगाम लावण्यासाठी नवनवीन प्रयोग अमलात आणत आहे. प्रतिवर्षी मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवड केली जाते. मात्र, वनविभागाच्या काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे शासनाचा मूळ उद्देश असफल होताना दिसत आहे. याकडे देखील शासनाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.”
सुरेश पालकर, वृक्षप्रेमी, मोहळाई
आतापर्यंत किती कारवाया केल्या? जाहीर करावे : गेल्या अनेक वर्षांपासून पारध परिसरात भरदिवसा मोठमोठी वृक्ष तस्करांकडून तोडली जात आहे. आजही ही वृक्षतोड कायम आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. तसेच वनराईने नटलेला घनदाट परिसर उजाड होत चालला आहे. वारंवार तक्रारी करून देखील काहीच उपयोग होत नाही. वनविभाग अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा दावा करीत असेल, तर आतापर्यंत वनविभागाने तालुक्यात किती कारवाया केल्या हे आकडेवारी व नावासह जाहीर करावे.